
अर्धापूर/नांदेड| स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर भर देत गावांची शाश्वत स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अर्धापूर तालुक्यातील बारसगावने कचरामुक्त गाव करण्याचा संकल्प केला आहे.
शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी अर्धापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एस. कदम, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ मिलिंद व्यवहारे, गटशिक्षणाधिकारी गोडबोले, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. एम. मुंडकर, आरोग्य विस्तार अधिकारी एस.पी. गोखले, शिक्षण विस्तार अधिकारी निजाम शेख, केंद्रप्रमुख विकास चव्हाण, तालुका गट समन्वयक राजेश जाधव आदींच्या उपस्थितीत गावात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या वेळी प्रभात फेरी, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, तसेच घरोघरी ओला व सुका कचरा वेगळा टाकण्यासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात ग्रामविकास अधिकारी गणेश आडे, बालाजी गोदरे, अमोल बारसे, शंकरराव बारसे, सारजाबाई खंडागळे, मनीषा खंडागळे, सविता गोदरे, अंगणवाडी सेविका गंगासागर मोरे, आशा वर्कर गंगाबाई बकाल, रंजीता ताटे यांच्यासह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थी बनले स्वच्छतादूत
गाव स्वच्छतेसाठी येथील जिल्हा परिषद शाळेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतादूत म्हणून घरोघरी जाऊन स्वच्छतेविषयी जनजागृती सुरू केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे घर व शेजारील दोन घरे दत्तक घेऊन स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली आहे. ओला व सुका कचरा वेगळा करा, सांडपाणी उघड्यावर सोडू नका, शौचालयाचा नियमित वापर करा, हात नियमित स्वच्छ धुवा अशा सूचना देत ते घरातील व्यक्तींशी संवाद साधत आहेत. यामुळे गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक हराळे, सहशिक्षक अर्चना तोटरे, सीमा नरवाडे, अनिता जज्जरवार, पंढरी आळे, कैलास पवार, संजय कुंडलवाडे यांचे विशेष योगदान आहे.
