सीटूचा दणका;ग्रामीण कोठा,भारत,मुथुट फायनान्स सह ११ गटाच्या बळजबरी करणाऱ्या विरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
5 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड। मौजे कासारखेडा ता.जि.नांदेड येथे जाऊन गटाचे पैसे भर, नाहीतर तुला आणि तूझ्या कुटूंबातील सदस्यांना जगणे मुश्किल करू म्हणत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच जनाविरुद्ध फिर्यादी सविता मारोतराव गायकवाड यांच्या तक्रारी अर्जा वरून अर्धापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

मायक्रो फायनान्सचे अजय नघुलवाड आणि अज्ञात चार जणांनी दि.१८ ऑक्टोबर रोजी कासारखेडा येथील सविता गायकवाड यांच्या घरी रात्री साडेआठ वाजता बेकायदेशीररित्या प्रवेश केला आणि गटाचे पैसे आताच भर म्हणून तगादा लावला.तसेच सीटू कामगार संघटनेच्या झेंड्याखाली उपोषण कसे काय केले म्हणत अर्वाच भाषेत शिवीगाळ केली आहे.आजारी असलेल्या सविताबाई गायकवाड ह्या आता पैसे नाहीत,पैसे आल्यावर भरतो असे म्हणताच बेकायदेशीररित्या वसुली साठी रात्री बेरात्री गेलेल्या गट चालकाने आणि त्याच्या सोबत असलेल्या इतर चार अनोळखी अज्ञात इसमांनी सराईत गुंडा प्रमाणे धमकावण्यास सुरवात केली आणि अश्लील शब्दात शिवीगाळ केली.

यावेळी फिर्यादी महिलेचा रक्तदाब वाढला आणि ती चक्कर येऊन बेशुद्ध जमिनीवर पडली तेव्हा धमकावणारे सर्वजन गांव सोडून निघून गेले.अर्ध्या पाऊण तासांनी सविताबाई शुद्धीवर आली तेव्हा तिला गावातील वर्षाताई हिंगोले,कविता खंडागळे, सुरेखा गायकवाड,कमलबाई हिंगोले, लताबाई लामटिळे यांनी पिण्यास पाणी दिले व धीर दिला.दि.२१ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाणे अर्धापूर येथे प्रत्यक्षात येऊन त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा अमरावती येथे पदोन्नतीवर बदली झालेले उप विभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना घडलेला प्रकार सांगून लेखी तक्रार दिली. पोलीस अधिकारी गायकवाड यांनी सूचित केल्याप्रमाणे ठाणे अंमलदार यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४,५०६ आणि ३४ नुसार एनसीआर दाखल करून पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल बक्कल क्रमांक १०४६ श्री बोइनवाड यांच्या कडे देण्यात आला.

बचत गटाच्या नावाने संस्था – कंपण्या स्थापन करून गोरगरीब महिलांना हेरून त्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन साप्ताहिक हफ्ता भरण्याच्या अटीवर लाख रुपया पर्यंत कर्ज देऊन सक्तीने वसुली केली जात असून कर्ज देणाऱ्या कंपण्यांना कुठून पैसा उपलब्ध होतो तसेच त्या कंपण्यांच्या आर्थिक व्यवहाराची चॊकशी करावी.कार्पोरेट कंपण्या आणि बड्या भांडवलदार घराण्याचे जसे हजारो करोड रुपये सरकाने माफ केले आहेत त्या धरतीवर गटाचे अल्प कर्ज उचलून अडचणीत आलेल्या सर्वांचे कर्ज माफ करावे या मागण्या साठी सीटू कामगार संघटनेने नांदेड जिल्ह्यात जन आंदोलन सुरु केले असून अनेक महिलांना १४-१५ गटा मार्फत कर्ज देण्यात आले आहे.कोणतीही कंपनी किंवा शासन मान्य संस्था सिबिल तपासल्या शिवाय कर्ज देत नाही परंतु कासारखेडा येथील महिलांना वेगवेगळ्या वीस संस्थानी अर्थातच गटांनी कर्ज दिले आहे.

हे कर्ज बेकायदेशीर पणे दिले काय हे तपासणे देखील महत्वाचे आहे.मागील गटाचे कर्ज फेड करण्यासाठी इतर गटाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जात असून महिना चार ते पाच हजार रुपये कमविणाऱ्या महिलांना दहा ते पंधरा हजार रुपये महिन्याकाठी भरणा करणे बंधनकारक असल्यामुळे आणि ते शक्य नसल्याने अनेकांना गावे सोडून अज्ञात स्थळी जाण्याची वेळ आली आहे.हा सर्व गंभीर प्रकार जिल्हाधिकारी यांना उपोषण करून निवेदनाद्वारे लेखी कळविण्यात आले आहे.

निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी शिष्टमंडळास सांगितले की,लवकरच बैठक बोलावण्यात येईल आणि त्या बैठकीला अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,पोलीस अधिकारी आणि गट तयार करून महिलांना कर्ज देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपण्याच्या प्रमुखांना बोलावून व पीडित महिला तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले असून गट चालकांनी पुन्हा वसुलीसाठी तगादा लावला तर तात्पुरते स्थगित केलेले उपोषण पुन्हा बेमुद्दत सुरु करण्यात येणार असल्याचे सीटू कामगार संघटनेने यापूर्वीच घोषित केले आहे.
गटामध्ये फसलेल्या बहुतांश महिला ह्या दलित,आदिवासी असल्यामुळे त्यांचा अवमान आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली तर अट्रॉसिटी दाखल करण्याचा वयक्तिक अर्ज पोलीस स्थानकात देण्यात येणार आहे.

संघटनेच्या सभासद असलेल्या महिला बँके मार्फत कर्जाची परतफेड करण्यास तयार असून त्यास किमान पाच वर्षाची सूट देण्यात यावी आणि वसूलीसाठी घरी कुणी येऊ नये व बळजबरी करू नये आदी मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
अर्जाच्या प्रति देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन आणि राज्याचे अर्थमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना देखील जिल्हाधिकारी यांचे मार्फत देण्यात आल्या आहेत.

पोलीस ठाणे अर्धापूर येथे गटा मार्फत कर्ज देणाऱ्या संस्थाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध दाखल झालेली गुन्ह्यांची नोंद बहुदा राज्यातील पहिलीच असावी. अदखलपात्र अहवालाच्या मजकूरामध्ये ग्रामीण कोठा,स्वतंत्र, सक्षम, स्पंदना,मुथुट,एकविटास,भारत, आरबीएल रत्नाकर, राधाई, इसाफ, सोमण आदी मायक्रो फायनान्स कंपन्याचे नावे आहेत.इतर दहा गटांची नावे आणि संपर्क क्रमांक जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहेत. पीडित महिलांना दिलासा मिळावा म्हणून सूरु केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड,जिल्हाध्यक्षा तथा राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, राज्य कमिटी सदस्य कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, बकॉ.वर्षाताई हिंगोले,कॉ. सोनाजी गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ.सुभाषचंद्र गजभारे कॉ. सविताबाई गायकवाड आदिजन करीत आहेत.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!