
नांदेड। क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे प्रेरणादायी कार्याचा वारसा नवपिढीने आत्मसात करुन जोपासणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पूणेचे अमित कांबळे यांनी केले.
नंदीग्राम प्राथमिक विद्यालय,नांदेड येथे आज क्रांतीज्योती, आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन तसेच विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या,त्यावेळी ते बोलत होते.
मुख्याध्यापक हाडपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर,धुप्पे, सौ.फुलवळकर मॅडम,सौ.लांडगे मॅडम, सौ.देशमुख मॅडम व बार्टीचे अमित कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करून उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी मु.अ.हाडपे सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले मौलिक विचार मांडले.
याप्रसंगी पूढे बोलतांना बार्टीचे अमित कांबळे यांनी महिला मुक्ती दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना स्त्री शिक्षणाच्या जनक व पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीमाईचा वारसा उत्कर्षाने पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत उच्च शिक्षणाची कास धरून सामाजिक न्याय विभाग व शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत आवाहन करीत शालेय विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेतील उपक्रमशील गुरूवर्य व शिक्षकवृंद यांच्याकडून प्रेरणा घेत वाटचाल केली पाहिजेत असा संदेश दिला. यावेळेस सावित्रीमाईंच्या वेशभुषेत आलेल्या विद्यार्थिनी कु.अन्वी,कु.राधिका,कु.विद्या,श्रध्दा संजना,अनुराधा आदींनी उत्कृष्टपणे वकृत्वाच्या माध्यमातून अभिवादन केले.
