
नांदेड| अर्धापूर तालुक्यात 9 जून रोजी झालेल्या वेगाचा वारा व पावसामुळे फळपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळपिक विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार नोंदवावी, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे.

अर्धापूर तालुक्यातील फळपिक नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाना पुर्व सूचना देण्यात आली आहे. आपण रब्बी हंगामातील फळपिक विमा भरला असेल व आपल्या (केळी पपई, आंबा-आंबिया बहार) या पिकाचे नुकसान वादळी वाऱ्याने झाले असल्यास wind speed वरील पर्याय निवडून पिक विमा कंपनीस पूर्व सूचना द्यावी.

पूर्व सूचना दिल्याशिवाय स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत विमा मिळत नाही. आपण आपल्या पिकाच्या नुकसानीची पुर्व सूचना टोल फ्री नंबर 14447 वर फोन करून किंवा क्रॉप इन्सुरन्स अॅपद्वारे द्यावी. पिक नुकसानीची पूर्व सूचना ही पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत (3 दिवसाच्या आत) देणे गरजेचे आहे. पूर्व सुचना दिल्यानंतर उपलब्ध झालेला docket Id सांभाळून ठेवावा जेणे करून फळपिक विमा योजनेचा लाभ मिळणे सोयीचे होईल, असेही आवाहन तालुका कृषि अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे.
