नांदेड, अनिल मादसवार| दहावी व बारावी परीक्षा संदर्भात समाज माध्यमांद्वारे सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या जर कोणी पसरत असेल तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अशा अफवांवर जिल्ह्याचे सायबर सेल लक्ष ठेवून आहे. थेट तुरुंगात रवानगीची कारवाई अशा अफवेखोरांवर केली जाणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12) वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 व माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा 20 ते 23 मार्च 2024 या कालावधीत तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
इयत्ता 12 व 10 वीच्या परीक्षा कालावधीत विविध माध्यमाद्वारे तसेच सोशल मिडीयावर परीक्षेच्या अनुषंगाने अफवा प्रसारित केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था वाढते, म्हणून अशा अफवा तसेच विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केल्या जाणाऱ्या बातम्या पसरविणाऱ्यांच्या विरोधात मंडळामार्फत कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधितांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.
बारावी परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांची नोंदणी परीक्षेसंदर्भात अडचणी असल्यास हेल्पलाईनवर संपर्क साधा
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12) वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8 लाख 21 हजार 450 विद्यार्थी व 6 लाख 92 हजार 424 विद्यार्थीनी आहेत. एकूण 10 हजार 497 कनिष्ठ महाविद्यालयमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे.
शाखानिहाय नोंदणी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. विज्ञान शाखेसाठी 7 लाख 60 हजार 46, कला शाखेसाठी 3 लाख 81 हजार 982 विद्यार्थी, वाणिज्य शाखेसाठी 3 लाख 29 हजार 905 विद्यार्थी, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) साठी 37 हजार 226 तर टेक्निकल सायन्स (आयटीआय) साठी 4 हजार 750 असे एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी काही अडचणी असल्यास विभागीय मंडळाच्या हेल्पलाईनद्वारे मार्गदर्शन मिळण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी यांची नोंद घ्यावी. लातूर विभागीय मंडळासाठी हेल्पलाईन क्रमांक 02382-251733 दिला असून यासाठी मो.क्र. 9405077991, 8379072565, 9423777789, 7767825495 संपर्क क्रमांक दिले आहेत. तसेच राज्यमंडळ स्तरावरही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी या हेल्पलाईन क्रमांकावर 020-25705271, 020-25705272 संपर्क साधावा. तसेच या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मंडळाकडून शुभेच्छा दिल्या आहेत.