हिमायतनगरातील पीडित शेतकरी कुटुंबाने त्या…तलाठ्याच्या सत्काराच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवली

हिमायतनगर/नांदेड। हिमायतनगर एका शेतकऱ्याने प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे जीवन यात्रा संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी याबाबत तक्रार केली आणि चक्क जाणीवपूर्वक चुकीचा फेरफार करणाऱ्या तलाठ्यांच्या जाहीर सत्काराची पत्रिका छापली आहे. त्यामुळे हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह महाराष्ट्रात चांगलं गाजत आहे. आता तरपीडित कुटुंबाने ईमेलद्वारे त्या तालाठ्याच्या सत्कार कार्यक्रमाचं निमंत्रण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले असल्याने आता याचा शेवट कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील परमेश्वर जाधव या शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनीचा त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन इतर दोन जणांच्या सांगण्यावरून हिमायतनगरचे तलाठी दत्तात्रय शाहूराव पुणेकर यांनी चुकीचा फेरफार केला, मंडळ अधिकारी दिलीप परसराम राठोड यांनी तो मंजूर केला, तसेच नगरपंचायत मधील प्रशासकीय व प्रभारी मुख्याअधिकारी, कार्यालयीन अधीक्षक व काही कर्मचारी यांनी त्या शेतकऱ्यांचं नावाने असलेली मालमत्ता शेख इम्रान शेख अन्वर, मिर्जा जुनेद बेग अमीर बेग यांच्या नावाने फेर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन बळकाऊ पाहणाऱ्या व्यक्तीच्या जमीन ताब्यात देण्याच्या धमक्यांना घाबरून १० जून २०२३ रोजी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली होती.
या घटनेनंतर पीडित जाधव कुटुंबाच्या तक्रारीवरून संबंधित आरोपीविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. तसेच नांदेड, हदगाव येथे अनेक चकरा मारल्यानंतर अखेर तलाठ्याने बेकायदेशीर रित्या नोंदविलेल्या फेरफार उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी 28 नोव्हेंबर रोजी रद्द केला. मात्र तलाठी, मंडळ अधिकारी, नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक व संबंधित कर्मचारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. ज्या तलाठ्यामूळ शेतकऱ्यांन विष प्राशन केलं त्या तालाठ्याच्या सत्कार समारंभाचे निमंत्रण पत्रिका छापली आहे, या कार्यक्रमाचं निमंत्रण जिल्हाधिकारी व अनेकांना देऊन उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध वर्तमानपत्रात, सामाजिक संकेत स्थळ, टीव्ही चॅनेलवर बातम्या प्रकाशित होताच हिमायतनगर सज्जाचे तलाठी दत्तात्रय शाहुराव पुणेकर यांची तडकाफडकी उचलबांगडी करून त्यांना भोकर तालुक्यातील देवठाणा येथील सज्जावर नेमणूक करून शिस्तभंग कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरे पाहता पीडित कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यां तालाठ्यास व यात सामिल असलेल्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांना कायम बडतर्फ करायला हवे होते. केवळ पदास्थापणेत अंशतः बदल करून चुकीचे काम करणाऱ्या त्या तलाठ्याला पाठीशी घालून सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विशाल जाधव यांनी केला आहे.
तसेच त्यांना माणसाच्या जीवाचे काहीही घेणं देणं नाही यांना फक्त अधिकारी यांच्यावर कार्यवाही होता कामा नये. नाहीतर हे प्रकरण आपल्या देखील अंगलट येईल याची पूर्ण दक्षता प्रशासनाकडून घेतली गेली असल्याचे यावरून दिसत आहे. त्यामुळे इतर बदलीच्या ठिकाणी गेल्यानंतर हा तलाठी चुकीचे काम करणार नाही याची काय गॅरंटी..? असा सवाल जाधव यांनी उपस्थित करून ईमेलद्वारे त्या तालाठ्याच्या सत्कार कार्यक्रमाचं निमंत्रण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण मोठया नेत्यांच्या टेबलवर गेलं असून, आतातरी गैर प्रकाराने शेतकऱ्याची मालमत्ता इतरांच्या नावे करणाऱ्या त्या तलाठ्याला व यात सामील असलेल्या मंडळ अधिकारी, नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी या सर्वांना कायमस्वरूपी घरी बसविण्यास कारणीभूत ठरेल काय..? किमान या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन ईतर अधिकारी कर्मचारी आपल्या कामकाजात बदल करून कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतील का..? याकडे हिमायतनगर शहरासह नांदेड जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
