नांदेडलाईफस्टाईल

आपल्या भागात जे खाद्यपदार्थ पिकतात त्यांचा आहारात समावेश आरोग्याला हितकारक – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड| प्रत्येक प्रदेशाची ओळख म्हणून एक खाद्यसंस्कृती विकसित असते. त्या भागातील हवामानानुसार त्या प्रदेशात एका विशिष्ट प्रकारच्या पिकाचे उत्पादन घेतले जाते. ते उत्पादन त्या भागातील लोकांना आरोग्यासाठी लाभदायक असते. आपल्या भागात म्हणजे मराठवाडयात विशेषत: पूर्वीपासून ज्वारी, बाजरी अशा तृण व भरडधान्य पिकाचे उत्पादन घेण्यात येते. त्याप्रमाणे आपण आपल्या भागात जे जे पिकते ते खाण्यावर अधिक भर देवून आपली खाद्यसंस्कृती जपली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य महोत्सवात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. देशमुख, प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) अनिल गवळी, आत्मा प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे, उपविभागीय कृषि अधिकारी व कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदीची उपस्थिती होती.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात “ रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य महोत्‍सवाचे” 19 व 20 ऑक्टोबर 2023 या दोन दिवशीय महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्‍सवात जिल्‍हयातील शेतकरी गट व महिला गटांचा सक्रिय सहभाग आहे. या महोत्सवात विक्रीच्‍या ठिकाणी जिल्‍हयात उपलब्‍ध होणाऱ्या सर्व रानभाज्‍याचा समावेश आहे.

यात शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेला भाजीपाला, सेंद्रीय उत्‍पादने, फळे, गुळ, हळद, लाकडी घाण्‍याचे करडीचे तेल, मध, धान्य, विविध डाळी व केळीचे वेफर्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रानभाजी व सेंद्रीय पध्दतीने पिकविलेल्या उत्पादनाच्या स्टॉलला भेट देवून पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तर आभार प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) अनिल गवळी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!