धर्म-अध्यात्मनांदेड

श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहण्यासाठी व त्या दिवशी दिवाळी साजरी करण्यासाठी सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा

नांदेड। पाचशे वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला मूर्त स्वरूप येत असल्यामुळे २२ जानेवारी २०२४ हा दिवस भारतीय इतिहासात स्वर्णाक्षरात लिहिला जाणार असून भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहण्यासाठी व त्या दिवशी दिवाळी साजरी करण्यासाठी सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाकडे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी मागणी केली आहे.

शरयू नदीच्या काठी वसलेल्या अयोध्याच्या पावन नगरीत प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापणाचा सोहळा संपन्न होणार आहे. आजच्या घडीला संपूर्ण विश्वाचे लक्ष अयोध्याकडे वेधले गेले आहे. आपल्याला शेकडो वर्षापासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती ती वेळ आता जवळ आली आहे. पण जस-जशे प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणाची वेळ जवळ येत आहे तस-तशी रामभक्तांची आतुरता अधीकच वाढत आहे.

उत्तर प्रदेशात वसलेल्या अयोध्येस रामनगरी म्हणून ओळखले जाते. त्यालाच इतिहासात “कोशल जनपद” असे देखील संबोधले गेले आहे. अयोध्येतून शरयू नदी प्रवाहीत होत असल्यामुळे त्या नदीस देखील विशेष ऐतिहासिक महत्त्व मिळाले आहे. दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी राम जन्मभुमीचे भुमीपूजन केले तो क्षण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा व स्वाभीमानाचा होता. कारण एका योग्य व्यक्तिच्या नेतृत्वामुळेच ह्या शुभ कार्याची खरी सुरुवात झाली. प्रभू श्रीराम मंदिराच्या सुनियोजित वास्तूचे स्वरुप हे अतिशय भव्य-दिव्य असणार आहे. ज्यात प्रार्थना विभाग, व्याख्यान विभाग, शैक्षणिक सुविधा विभाग, संत निवास, संग्रहालये राहणार आहेत.

प्रभू श्रीराम मंदिराचे वास्तू कार्य पूर्ण झाल्यानंतर विश्वातील सर्वात मोठ्या तिसऱ्या क्रमांकावरील हिंदु मंदिर राहणार आहे.जेव्हा रावणास पराभूत करुन प्रभू श्रीराम लंकेतून अयोध्येस परतले होते, तेंव्हा त्यांच्या स्वागतासाठी दिवाळी साजरी केली गेली होती. ती प्रथा शेकडो वर्षापासून आपण दरवर्षी साजरी करतो. अगदी त्याच प्रमाणे प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापणेच्या दिवशी दि. २२ जानेवारी २०२४ दिवाळी व दिपोत्सव साजरा केला जाणार आहे. त्या दिवशी प्रत्येक मंदिरात भजन, किर्तन ,पूजा, हनुमान चालीसा, रामरक्षा स्त्रोत, श्रीराम स्तुती ई. चे पठण व श्रीराम नामाचेच जप केले जात आहे.

विविध सेवाभावी सामाजिक, धार्मिक संघटना आणि मंदिरांतर्फे या साठी कामाला लागले आहेत. प्राण प्रतिष्ठापणेच्या संध्याकाळी सर्वत्र घरोघरी दिवे लावून दिपोत्सव देखील साजरा केला जाणार आहे. एकंदरीत हा दिवस भारतासह जगभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी सार्वजनिक सुट्टी अथवा स्थानिक सुट्टी जाहीर करावी असे निवेदन केंद्र व राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर,प्रा.अवधेशसिंग अशोकसिंग सोळंकी यांनी पाठविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!