![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2024/01/Advertise-Here-Banner.jpg)
नांदेड। जाणीवपूर्वक चुकीचा फेरफार करून माझ्या कपाळावरचं कुंकू पुसून माझे लहान लहान लेकरे पोरके करणाऱ्या हिमायतनगर च्या कर्तुत्ववान, इमानदार तलाठ्याचा बैंड लाऊन भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची आगळी वेगळी पत्रिका सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, या प्रकारामुळे महसूल विभागाच्या प्रतिमेला लागलेला डाग गांधीगिरी च्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न जाधव कुटुंबातील सदस्यांनी केला असल्याची जोरदार चर्चा होते आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी हिमायतनगर शहरात युवा शेतकरी परमेश्वर जाधव यांनी येथील तलाठी दत्तात्रय शाहूराव पुणेकर, मंडळ अधिकारी दिलीप परसराम राठोड यांनी चुकीचा फेरफार केल्यामुळे जमीन बळकाऊ पाहणाऱ्या व्यक्तीच्या धमक्यांना घाबरून विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली होती. या घटनेनंतर मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल झाले, तसेच बहुत प्रयासानंतर अखेर तलाठ्याने केलेला चुकीचा बेकायदेशीर रित्या नोंदविलेल्या फेरफार उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी 28 नोव्हेंबर रोजी रद्द केला आहे, मात्र चुकीचा फेरफार करणाऱ्या तलाठ्यावर व मंडळ अधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता एक प्रकारे अभय दिले आहे.
त्यामुळे पीडित महिलेने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन माझ्या कपाळावरचं कुंकू पुसुन आमची पोरं पोरकी झाली तरी सत्यमेव जयते म्हणणारे आपले काही कर्तव्यपरायण अधिकारी अश्या तलाठ्याला आणि मंडळ अधिकाऱ्याला पाठीशी घालून प्रोत्साहन देतात. हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे लक्षण आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. आपल्या अधिकाऱ्याने माझ्या नवऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करून माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलय आणि माझं घर उघड्यावर आणलय. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल माझी अणि पोरक्या मुलांची इच्छा आहे की भर चौकात बँड लावून हिमायतनगर येथील तलाठ्याचा भव्य सत्कार करावा आणि यावेळी आपणही उपस्थित राहिलात तर आम्हाला अधिक आनंद होईल असं निमंत्रण देणारी पत्रिकाचं छापली आहे. सदरील पत्रिका सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल झाली असून, जिकडे तिकडे महसूल विभागाच्या आलबेल कारभाराची जोरदार चर्चा केली जाते आहे.
![]()
या संदर्भात दोषी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कायम स्वरूपी बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार देऊन केली होती. दोन दिवसात या प्रकरणावर योग्य ती कार्यवाही करावी असे त्यांनी निर्देश दिले, मात्र अद्यापही या संदर्भात दोषी अधिकाऱ्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने हे आम्हाला पाऊल उचलावे लागले असल्याचे पीडित महिला ज्योत्सना परमेश्वर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
शेवटी पत्रिकेत हिमायतनगर येथील कर्तव्यदक्ष, इमानदार अधिकाऱ्याच्या सत्कर्मामुळं विधवा झालेल्या या अनाथ मुलांच्या आईची ही विनंती आहे. आपण या सत्काराचा स्वीकार करून, पोरक्या झालेल्या या कुटुंबाला उपकृत करावे अशी मी माझ्या लेकरांसह आपल्याला विनंती करते. असे या पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. एव्हढेच नाहीतर या पत्रिकेवर खास करून सत्कारमुर्ती :- कर्तव्यदक्ष तलाठी दत्तात्रय शाहूराव पुणेकर यांचा सत्कार दि. ०३ जानेवारी २०२४ वेळ स. ११ वाजता ठिकाण : बस स्टँड हिमायतनगर, ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथे आयोजित केल्याचं पत्रिकेत नमूद करून शेवटी निमंत्रण देणाऱ्या पीडित महिलेने विनीत म्हणून:- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची व पोरक्या मुलांची आई अश्या प्रकारे छपाई केली आहे. या आगळ्या वेगळ्या पत्रिकेची हिमायतनगर शहर व परिसरात जोरदार चर्चा केली जाते आहे, यावर जिल्हाधिकारी काय..? निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेलं आहे. याबाबत संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा नंबर स्विच ऑफ असल्याचे सांगण्यात आले आहे.
मायेच्या लालसेपोटी हिमायतनगर येथील तलाठी मंडळ अधिकाऱ्यांने परस्पर माझ्या भावाच्या नावाने असलेली जमीन ही भूखंड हडप करून पाहणार आहे त्या नावाने करून एक प्रकारे त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर कायमस्वरूपी बडतर्फी करण्याची कार्यवाही करणे वरिष्ठांना क्रमप्राप्त होते. मात्र केवळ चुकीचा फेरफार रद्द करून सदर तलाठी मंडळ अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न उपविभागीय अधिकारी यांनी केला आहे, मात्र यावर मी थांबणार नाही हिमायतनगर येथील तलाठी मंडळ अधिकारी यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यासाठी मी पंधरा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अर्ज दिले. मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे माझ्या भावाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना घरी बसवण्यासाठी मंत्रालय स्तरापर्यंत पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया विशाल जाधव यांनी मीडियाशी बोलताना दिली.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार – सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ सूर्यवंशी
यासंदर्भात जिल्हाधिकारी महोदयांनी उपविभागीय अधिकारी हदगाव यांना तात्काळ पत्र काढून तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करावी असे सांगितलं आहे,परंतु महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे देखील तात्काळ कारवाई करावी असे निर्देश असूनदेखील उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार सदर तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत,याबाबत महसूलमंत्र्याच्या पत्राला केराची टोपली दाखविली व कुठलीही किंमत उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिली नाही,त्यामुळे अरुणा संगेवार यांच्या बेजवाबदांर विरुद्ध देखील आंदोलन करण्यात येईल. त्यांची तक्रार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात येईल…! असे ही जाधव कुटुंबातील सदस्यांना सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/Hardweyar-Nagu.jpg)