क्रीडानांदेड

नांदेडमध्ये ” कौन बनेगा विश्वविजेता ” या स्पर्धेचे आयोजन

नांदेड। सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा रंगात आली असून सट्टेबाजीला आळा बसावा आणि कल्पकतेला वाव मिळावा यासाठी नेहमीप्रमाणे ” कौन बनेगा विश्वविजेता ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अचूक उत्तरे देणाऱ्या दहा विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.*

भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघाच्या वतीने या स्पर्धेचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांच्यातर्फे संभाजी उमरेकर हाइट्स, शिवाजीनगर नांदेड येथे मोठ्या पडद्यावर विश्व चषकाचे सामने पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. त्यांच्यासमोर घोषणा करताना दिलीप ठाकूर यांनी अशी माहिती दिली की, मोठ्या पडद्यावर सामने दाखवण्याची ही पंधरावी वेळ आहे.तसेच यापूर्वी कौन बनेगा क्रिकेट विश्वविजेता, कौन बनेगा फुटबॉल विश्वविजेता,कौन बनेगा नांदेड का एमपी,कौन बनेगा नांदेड का एमएलए या यासारख्या २५ पेक्षा जास्त स्पर्धा वेळोवेळी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

या स्पर्धांना नांदेडकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे.प्रत्येकाने आपल्या मनात कोण जिंकेल याची खूणगाठ बांधलेली असते. आपल्या अंदाज व्यक्त करण्यासाठी काहीजण आपसात पैज लावतात तर काहीजण सट्टेबाजीकडे वळतात. परंतु त्यामध्ये मोठे नुकसान झाल्यामुळे कित्येकांना आत्महत्या करावी लागली आहे. मनातील खुमखुमीला व्यक्त करण्यासाठी संधी मिळावी व कोणतेही नुकसान होऊ नये या उद्देशाने हा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी घेण्यात येणाऱ्या ” कौन बनेगा विश्वविजेता ” स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे नियम ठेवण्यात आले आहे.

इच्छुकांनी उपांत्य फेरीत कोणते चार संघ आपसात लढतील. तसेच अंतिम फेरीमध्ये कोणते दोन संघ सहभाग घेऊन त्यात विजेते कोण ठरणार याचा अंदाज ३१ ऑक्टोबर पर्यंत व्यक्त करायचा आहे. त्यासाठी ९४२१८ ३९३३३ या मोबाईल नंबर वर स्पर्धकांनी स्वतःचे नाव व गाव लिहून सेमी फायनल मध्ये खेळणाऱ्या चार संघाची नावे, फायनल मध्ये भाग घेणाऱ्या दोन संघाची नावे आणि संभाव्य विजेत्या संघाचे नाव साध्या एसएमएस द्वारे पाठवायचे आहे. याशिवाय मोठ्या पडद्यावर क्रिकेट मॅच सुरू असताना साध्या कागदावर आपला अंदाज लिहून जमा केल्यास त्यांनाही स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल.अचूक उत्तर देणाऱ्या दहा विजेत्यांना एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.

दहापेक्षा जास्त स्पर्धकांनी अचूक उत्तर दिल्यास जाहीर सोडतीद्वारे दहा स्पर्धकांची निवड करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. एका मोबाईल वरून फक्त एकदाच भाग घेता येईल. तरी आपल्या मनातील उत्सुकतेला दिशा देण्यासाठी नागरिकांनी या स्पर्धेची माहिती इतर क्रीडा रसिकांना देऊन मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!