
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास विद्यार्थ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी विद्यापीठाने हा एक चांगला पुढाकार घेतलेला आहे. कारण अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनाची सुरुवात होत असते, असे मत महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्री मा. डी.पी. सावंत यांनी व्यक्त केले.

ते आज दि. २० मार्च रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण, डॉ. हनमंत कंधारकर, कौशल्य विकास केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तमलवार, अरविंद कंग्रालकर, अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. डी. एम. खंदारे, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील अब्दुल करीम यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मेळाव्यास ३२०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. स्पॉट नोंदणी मध्ये १२०० विद्यार्थी आले आहेत. असे एकूण जवळपास ४५०० विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेतला आहे. या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी जवळपास ५० कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखत घेण्यासाठी आलेले आहेत.
याप्रसंगी मा. व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांनी नॉलेजबाबतीत स्वतःला नेहमी अद्यावत ठेवले पाहिजे. विद्यार्थी दशेत इतर गोष्टीपेक्षा स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांना १३ भाषा अवगत होत्या. आज इतर भाषा तर सोडाच मातृ भाषेवरही आपले पुरेसे प्रभुत्व राहिलेले नाही. इंग्रजी सारखी महत्त्वाची भाषा अवगत करून तिच्यावर प्रभुत्व मिळविणे ही काळाची खरी गरज आहे.
अध्यक्षीय समारोपात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले, असे रोजगार मेळावे आयोजन करण्याची ही विद्यापीठाची पहिलीच वेळ आहे. येथून पुढे वर्षातून दोन वेळा नियमितपणे अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन होणार आहे. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक कंपनीसोबत आपण सामंजस्य करार करणार आहोत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने येथे आलेल्या कंपन्यांना मुलाखत द्यावी आणि यशस्वी जीवनाची वाटचाल सुरू करावी, अशा शुभेच्छाही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिल्या. या दरम्यान नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही या मेळाव्यास भेट देवून उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. बालाजी मुधोळकर, प्रा. डॉ. बी सुरेंद्रनाथ रेड्डी, प्रा. डॉ. शैलेश वाढेर, प्रा. डॉ. कृष्णा चैतन्य, प्रा. डॉ. एल.एच. कांबळे, प्रा. डॉ. निना गोगटे, प्रा. डॉ. सुहास पाठक, प्रा. डॉ. अर्चना साबळे, प्रा. डॉ. योगेश लोलगे, प्रा.डॉ. महेश जोशी, प्रा. डॉ. काशिनाथ बोगले, प्रा. डॉ. राजकुमार मून यांनी परिश्रम घेतले आहे.
