नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून आज मला पाच वर्षे पूर्ण झाले आहे. या पाच वर्षांमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी यशस्वीपणे काम करू शकलो. माझ्या कार्यकाळात विद्यापीठातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडल्याचे मला समाधान आहे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.
ते शनिवार दि. ४ नोव्हेंबर रोजी विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहातील मंचावर निरोप संभारंभामध्ये आपले मनोगत व्यक्त करतांना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मीरा भोसले, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्र.वित्त व लेखा अधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. एम के. पाटील, जाधव मॅडम, डॉ. दिपक पानसकर, डॉ. विकास सुकाळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. माधुरी देशपांडे, डॉ. सुरेखा भोसले, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. संतराम मुंडे, नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा विभागाचे प्र. संचालक डॉ. मनोज रेड्डी, नवउपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. राजाराम माने, डॉ. शैलजा वाडीकर, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर यांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांना पुष्पगुच्छ, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल इत्यादी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
पुढे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, या विद्यापीठाशी निगडित प्रत्येक घटकांने, प्राधिकरणातील प्रत्येक सदस्याने, व्यक्तीने, कर्मचाऱ्याने, विद्यार्थ्यांने जे मला भरभरून प्रेम दिले त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. मी माझ्या कार्यकाळात नेहमी सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न केला आहे. मी या मातीतील असल्यामुळे या विद्यापीठासाठी काहीतरी चांगले काम करण्याची प्रेरणा नेहमीच माझ्या पाठीशी होती. संलग्नित महाविद्यालयासाठी विद्यापीठाची भूमिका ही नेहमीच मार्गदर्शक असते. विद्यापीठाबरोबरच महाविद्यालयालाही सक्षम करण्यासाठी मी सर्वोपतरी प्रयत्न केले आहेत. आपला विद्यार्थी पुणे – मुंबईकडील विद्यार्थ्यांपेक्षा कुठेही कमी नाही, गरज आहे ती प्रेझेंटेशन आणि अॅटीट्यूड मध्ये बदल करण्याची, असा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, डॉ. नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, प्राचार्य बी.यू. जाधव, सिनेट सदस्य युवराज पाटील, प्र. क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलजा वाडीकर, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर यांनीही कुलगुरूंच्या पाच वर्षातील केलेल्या कामाबद्दल प्रशंसा करून आपले मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाशी संलग्नित सर्वच संघटनांनी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी कुलगुरूंचा सत्कार केला. यामध्ये संस्थाचालक संघटना, प्राचार्य संघटना, प्राध्यापक संघटना, विद्यार्थी संघटना, अधिकारी संघटना, कर्मचारी संघटना व तसेच वैयक्तिक स्वरूपातही कुलगुरूंचा सत्कार करून सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्र. वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.