नांदेड जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी

नांदेड| एज्युकेशन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडची मतदानाची टक्केवारी मात्र अनेक जिल्ह्यापेक्षा कमी राहते. त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन आपला मताधिकार बजावावा. यासाठी नागरिकांनी येत्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. जिल्हास्तरीय मतदान जनजागृती अभियानाच्या प्रचार प्रसार मोहिमेला गतिशील करण्याचे आदेश त्यांनी आज दिले.
विविधतेचा जिल्हा म्हणून नांदेड जिल्हा ओळखला जातो. मात्र येत्या निवडणुकीनंतर सर्वाधिक मतदान करणारा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने स्वीप अंतर्गत सांगितलेल्या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदान जनजागृती अभियान राबविताना केवळ एक उपक्रम पार पाडणे ही भूमिका न ठेवता शाळा महाविद्यालय स्तरावर जनजागृती अभियान सक्रियतेने राबविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
स्वीप अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये 26 फेब्रुवारी रोजी निवडणुकीच्या विषयांवरील चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 27 फेब्रुवारीला भाषण व वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीला निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर 29 तारखेला सायकल फेरी प्रभात फेरी व मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी शाळा व महाविद्यालय स्तरावर हे आयोजन होत असून सर्व तहसीलदारांनी 7 मार्चपर्यंत आपल्या तहसील अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळेतून तीन चित्र व निबंधाची निवड करून कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. ही संपूर्ण प्रक्रिया गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सर्व संबंधित यंत्रणा पार पाडणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राथमिक माध्यमिक व अन्य व्यवस्थापनातील मुख्याध्यापक तसेच मनपा शाळा या सर्व संबंधितांनी 7 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या- त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात प्रत्यक्ष विजेत्यांची नावे व कार्यपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
महाराष्ट्रातून सर्वाधिक मतदान करणारा जिल्हा म्हणून नांदेडला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश सर्व सामाजिक संस्था तसेच तरुणांना करण्यात आले आहे. या जनजागृती अभियानातील स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
