
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। शेती अवजारे बि-बियाणे व औषधांच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच नैसर्गिक आपत्ती व मजुरीदरात झालेली वाढ यासह अन्य कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला असतांना कृषिमंत्र्यांनी शेतकर्यांना कर्जमाफी करुन हातभार लावण्या ऐवजी चक्क कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्नात उधळपट्टी करतात.
अशा आशयाचे बेताल विधान राज्याचे कृषिमंत्री यांनी केल्याने तुम्ही शेतकरी कैवारी की वैरी असा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी उपस्थित करीत शेतकऱ्यां बदल बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टी, निसर्गाचा असमतोल, शेतमालाला भाव नसणे व रब्बी हंगामासाठी सिंचनाचे क्षेत्र अतिशय कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची आजची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचारादरम्यान कर्जमुक्तीचे शेतकऱ्यांना गाजर दाखवले. राज्यातील निवडणुका जिंकण्या पुरत्या सताधार्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करु अशा भुलथापा देऊन सतेत बसलेल्या सताधार्यांना आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी चा विसर पडला.
कर्जमाफी तर नाहीच मात्र चक्क शेतकऱ्यांच्याच मतावर निवडून यायचे आणि दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवायची अन् शेतकऱ्यांच्या मुला बाळांच्या लग्नाचा खर्च काढायचा अशी कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची खिल्ली उठविणारे बेताल विधाने राज्याचे कृषिमंत्री मानिकराव कोकाटे यांच्याकडून होत असुन ते शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळल्या गत आहे.या विधानाचा शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख ज्योतीबा खराटे यांनी निषेध नोंदविला आहे.
