रोहित पवारांसह सगळेजण मंत्रीमंडळात जायला तयार होते, सगळ्यांच्या पत्रावर सह्या

नाशिक : ‘अजित पवार गटातला एकही माणूस असा नाही, जो ब्लॅकमेल करेल. काहीही आपलं बोलायचं, उलट रोहित पवार आणि सगळ्यांनी मंत्रीमंडळात जायचं, असा निर्णय घेत या पत्रावर सह्या केल्या असल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. विरोधी पक्षात असल्यावर हे बोलायला पाहिजे, नाहीतर विरोधी पक्षाचे आमदार म्हणून कसं सिद्ध होईल? यासाठी हा खटाटोप असल्याचे वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्यासह इतर आमदार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर अनेक घडामोडी समोर आल्या. मात्र गेल्या काही दिवसात रोहित पवार आणि अजित गटातील नेत्यांचा संघर्ष टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे एक आमदार आणि खासदार अजित पवार गटात जाण्याबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले. काही नेत्यांचा ब्लॅकमेलिंग सुरू आहे तू सही कर नाहीतर काम होणार नाही, असं कदाचित सांगितलं जात असा आरोप रोहित पवार यांनी केला. यावर भुजबळ यांनी रोहित पवार यांचा समाचार घेत मंत्रिमंडळात जाण्यासाठी रोहित पवार यांच्यासह सगळ्यांच्या सह्या पत्रावर करण्यात आल्या होत्या, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे.
तसेच विजय वड्डेट्टीवर (Vijay Vadettiwar) यांच्या टीकेला उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, विरोधी पक्षाकडून टीका सुरु आहे, ते त्यांचं काम करत आहेत. ते सगळे बोलणारच, विरोधी पक्षात असल्यावर ते काय करू शकतात? असं भुजबळ म्हणाले. तर राष्ट्रवादी पक्षाचं सुनावणीवर भुजबळ म्हणाले की, पवार साहेब म्हणाले होते, कायदेशीर लढाई लढणार नाही. पण नोटीसा द्यायचे काम झाले आहे. बघू काय होते ते? असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी (Nashik Onion Issue) पुकारलेल्या संपाबाबत छगन भुजबळ म्हणाले की, कांदा व्यपाऱ्यांचे काही प्रश्न भारत सरकारशी निगडित असून काही प्रश्न राज्य सरकारशी निगडित आहेत. वाणिज्य मंत्री पियूष गोयल ही मंडळी लोकसभा अधिवेशनात गुंतलेली आहे. सद्यस्थितीत कांदा प्रश्न हा अडचणीचा भाग झाला असून मुख्यमंत्री यांच्या कानावर घातलं आहे. लवकरच काहीतरी मार्ग निघेल, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.
