नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे सर्वधर्मीय, सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा वातानुकूलित हॉलमध्ये मोठ्या थाटात संपन्न

नांदेड/बिलोली,गोविंद मुंडकर। येथे सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विवाह सोहळ्यात विविध जाती आणि धर्मातील सहा जोडप्यांचा शाही पद्धतीने मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला.
कथितपणे स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी लग्नाच्या कार्यक्रमात खर्च करण्याची पद्धत अनेक वर्षापासून सुरू आहे. ही कथित प्रतिष्ठेसाठी वधू किंवा वर पक्षाला मोठ्या प्रमाणात याचा फटका बसतो. काही ठिकाणी दोघांनाही आर्थिक झळ मोठ्या प्रमाणात बसत असते. स्थळ जुळवण्याच्या आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली काहींना तर निव्वळ कर्ज काढून असा उपक्रम आटोपावा लागतो. याचबरोबर समाजामध्ये नाचक्की होऊ नये म्हणून रूढी आणि परंपरा चालू ठेवण्यात येतात.गरजूंना शंभर रुपये खर्च न करणारी मंडळी लग्नात मात्र निष्कारण मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी कूचराई करत नाहीत.
असा पायंडा टाळण्यासाठी सामूहिक विवाह पद्धत समाजधुरीण विकसित करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत नाही. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणे ही समाजात नाचक्कीचे बाब काही कथित खोटी प्रतिष्ठा बाळगणाऱ्यांना वाटते. अशातही तब्बल वीस वर्षापासून सामूहिक विवाह सोहळा ठक्करवाड परिवार आणि सामूहिक विवाह सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी घेण्यात येतो. यात सगरोळी, बिलोली आणि कुंडलवाडी तसेच कासराळी येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात योगदान देत असतात. यावर्षी गंगाराम ठक्करवाड यांचे दुःखद निधन ही घटना आणि निवडणुकांची धामधूम लक्षात घेता यावर्षी विवाह सोहळा संपन्न होणे कठीणच नव्हे तर अशक्य वाटत होते.
मात्र अरविंद ठाकरवाड यासह बिलोली, कुंडलवाडी, कासराळी, सगरोळी येथील व्यापारासह समाजातील महत्त्वपूर्ण मंडळींनी पांयडा खंडित पडू नये म्हणून कमी वेळेत सहा विवाह जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न करण्यात यश मिळवले. यावर्षी हा विवाह सोहळा दिनांक एक मे 2024 रोजी बिलोली येथील माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार यांच्या वातानुकूलित शाही हॉलमध्ये घेण्यात आला. जेथे प्रतिष्ठित आणि दिग्गज कुटुंबाचे विवाह सोहळे वातानुकूलित हॉलमध्ये करण्यात येत होते तेथे या वर्षीचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
विवाह सोहळा समितीच्यावतीने भोजन, विवाह कक्ष मनी मंगळसूत्र यासह वधू-वरांना आहेर करण्यात आले. असा विवाह सोहळा लक्षात घेता अनेकांनी यात सहभागी होणे आणि सर्व धर्मीय विवाह सोहळ्यात विवाह संपन्न करणे याविषयी सकारात्मक विचार मांडले. याप्रसंगी सर्वश्री लक्ष्मणराव ठक्करवाड, विजयकुमार कुंचनवार, गोविंद मुंडकर, साईनाथ उत्तरवाड, चंद्रशेखर पाटील यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले.
या कार्यक्रमात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले बिलोली येथील वैश्य समाजातील व्यापारी म्हणाले की, अशा कार्यक्रमात माझी केवळ उपस्थित राहणे हीच इच्छा नसून अशा कार्यक्रमात माझ्या कुटुंबातील मुलांचे विवाह संपन्न करण्याचा मानस आहे. सर्व स्तरातील सर्व क्षेत्रातील सर्व जातीतील व्यक्तींनी अशा कार्यक्रमाचे आयोजनच करणे नव्हे तर स्वतःच्या कुटुंबातील मुलांचे आणि मुलींचे विवाहाचे कार्यक्रम करणे ही खरी गरज असल्याचे बिलोली येथील प्रतिष्ठित व्यापारी यांनी व्यक्त केले.
विशेष म्हणजे कै. गंगाराम ठक्करवाड यांनी तसे केले होते. या कार्यक्रमासाठी विश्वनाथ अण्णा दाचावार, अशोक गरुडकर, प्राध्यापक कमटलवार, किशोर गरुडकर, यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी बिलोली तालुक्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
