नांदेड| दिवसेंदिवस भूगर्भातील पाणी पातळी घटत चालली आहे. ही पातळी वाढवण्यासाठी शासनाच्या विविध जलसंधारण योजना राबवल्या जात आहेत. अशाच योजनांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी जलतारा ही उपयुक्त योजना सुरू केली आहे.

जलतारा म्हणजे शेतात खोदलेला शोषखड्डा, ज्यातून पावसाचे पाणी जमिनीत मुरते व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. जमिनीतील ओलावा टिकतो, त्यामुळे शेती हरित आणि सक्षम होते. जलतारा हा रिचार्ज पिट असून, त्याचा आकार चार बाय चार फूट असून सहा फूट खोल खड्डा तयार करून त्यात शेतातील दगडधोंडे भरायचे असतात.

या योजनेत शेतकऱ्यांना मजुरी स्वरूपात चार हजार सहाशे रुपये अनुदान मिळते. एका एकर शेतीसाठी एक जलतारा तर एका हेक्टरसाठी तीन जलतारे घेता येतात. शेतातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होऊन भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या माध्यमातून चिबाड जमिनीतही अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो, ओलावा टिकतो तसेच शेती उत्पादकतेत वाढ होते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे सातबारा उतारा, ८अ उतारा, मनरेगा जॉब कार्ड आवश्यक आहे. अर्जदार जॉब कार्डधारक असावा व त्याच्याकडे किमान एक एकर शेती असणे गरजेचे आहे.
येत्या 15 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत जलतारा घेण्याची नोंदणी करण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आपली नावे ग्रामपंचायतीकडे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीतील नरेगा कक्षाशी संपर्क साधावा. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली व नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी केले आहे.
