
हिमायतनगर,परमेश्वर काळे। येथील गैर कारभार करणाऱ्या त्या तलाठ्याची बदली झाल्यानंतर या ठिकाणचा पदभार अद्याप तरी कोणत्याही तलाठ्याला देण्यात आला नाही. त्यामुळे हिमायतनगर शहर व तालुका परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असलेले प्रमाणपत्र आणि अतिवृष्टी मदत, पीकविमा मिळविण्यासाठी मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर इतर कागदपत्रासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे, ही बाब लक्षात घेता तात्काळ हिमायतनगर येथील तलाठी पदाचा कारभार तत्कालीन तलाठी श्री पुरी यांच्याकडे देण्यात यावा अशी मागणी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान पठाण यांनी केली आहे

हिमायतनगर शहर तालुक्याचे ठिकाण आहे, शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणचे नागरिक मोठ्या संख्येने हिमायतनगर शहरात येतात. आता तर हिमायतनगर शहराला नगरपंचायतीच्या दर्जा मिळाला असून, शासनाकडून नगर विस्तारासाठी सुद्धा देखील प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तसा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हिमायतनगर शहर हे विकासाच्या मार्गाने पुढे येत आहे. त्याच पद्धतीने हिमायतनगर शहरात विविध कार्यालय मध्ये अधिकारी कर्मचारी यांचा तुटवडा निर्माण होणार नाही. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु हिमायतनगर तहसील, पंचायत समिती, आरोग्य विभाग यासह विविध कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांचे अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिक व सर्वसामान्य शेतकरी बांधवांना मोठे अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन हिमायतनगर शहरातील सर्वच विभागातील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे तात्काळ पदे भरणे आवश्यक आहे.

यासंदर्भात मागील काळात हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे कट्टर समर्थक तसेच काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण यांनी सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी केली आहे. तसेच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हिमायतनगर शहरातील महत्त्वाचे म्हणजे तलाठी पद रिक्त झाले आहे. या बाबीकडे ही त्यांनी आमदार माधवराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजात राऊत व तहसीलदार गायकवाड यांचे लक्ष वेधले आहे. सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आज हिमायतनगर येथील तलाठी पदाचा कारभार तत्कालीन तलाठी श्री पुरी यांच्याकडे सोपविण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला मान्य करून हिमायतनगर शहराला तलाठी मिळेल का.. ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
